सिटी न्यूज सुपरफास्टच्या हजारो प्रतींची होळी.. गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा..
salim khan 3 march 2026
अकोला अमरावती वाशिम सह अहिल्यानगर,श्रीरामपूर,शिर्डीत संतापाची ज्वाला
सायंदैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट विरोधातील आंदोलनाने काल राज्यात तीव्र वळण घेतले. अमरावती वाशिम अकोल्यासह अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि शिर्डी येथे पत्रकार बांधव तसेच महिला पत्रकारांनी पुढाकार घेत संबंधित दैनिकाच्या हजारो प्रती जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.
घोषणाबाजी, निषेध फलक आणि आक्रमक भूमिका यामुळे आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र झाले. 24 फेब्रुवारी पासून नाव न घेता एका पत्रकारावर खंडणी मागणे ब्लॅकमेल करणे, अशा स्वरूपाचे अनेक बिन बुडाचे गंभीर आरोप सिटी न्यूज सुपरफास्ट सायं दैनिकाने केले या वृत्तामुळे सर्व पत्रकार बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला
बातमीमध्ये स्पष्ट एका पत्रकाराच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे सर्व पत्रकारांना समाजामध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असून जनसामान्य प्रत्येकाला संशयाच्या नजरेने बघत आहेत त्यामुळे स्वतःच्या आत्मसन्मानासाठी तेल्हारा येथील पत्रकार संघटना व पत्रकार बांधवांनी सिटी न्यूज सुपरफास्ट या दैनिकाच्या विरोधात हा लढा उभा केला आहे,
पत्रकार संघटनांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, केवळ वर्तमानपत्र जाळून निषेध व्यक्त करून थांबणार नाही. रंगपंचमी झाल्यानंतर गुरुवारपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदने देत आक्रमक आंदोलन छेडले जाणार आहे. संविधानिक मार्गाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अनेक पत्रकार संघटनांनी दिला आहे.
आंदोलनात सहभागी पत्रकार बांधवांकडून माहिती देण्यात आली की, “पत्रकारांच्या आत्मसन्मानावर वार करणाऱ्या प्रवृत्तीला आता ठोस आणि प्रभावी उत्तर दिले जाईल. केवळ प्रती जाळणे हा प्रारंभ आहे; यापुढे अधिक संघटित, कायदेशीर आणि आक्रमक आंदोलन उभारले जाईल.” महिला पत्रकारांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात आघाडी घेतल्याने या लढ्याला व्यापक पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून पत्रकार संघटनांनी एकजूट दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार केला आहे. आगामी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोरील धरणे आंदोलनामुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
पत्रकारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संबंधित दैनिक आणि प्रशासन यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







